" भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा"
Showing posts with label साद देती सह्यशिखरे. Show all posts
Showing posts with label साद देती सह्यशिखरे. Show all posts

Wednesday, December 21, 2016

पाषाणपुष्प - कमळगड

            "कमळगड लवकरच" - बरेच दिवस भ्रमणमंडळाच्या Whatsapp Group चा हाच Subject  होता.


            शेवटी मुहूर्त लागला आणि जायचा दिवस उजाडला. हो नाही करत करत ७ वीर या मोहिमेसाठी तयार झाले. पैकी मी, प्रद्युम्न, सुहास, मकरंद, सायली गाडीतून आणि चिन्मय, नेहा Bike वरून येणार असं ठरलं . सकाळी लवकर निघून पायथ्याशी  असलेल्या तुपेवाडी जवळ राहणाऱ्या विष्णूबुवां कडं जेवायचं, मग तासभर विश्रांती घेऊन गड चढायला सुरु करायचं असं ठरलं होतं. पण नेमकी सकाळी काही कामं लागल्यामुळं मलाच आवरायला उशीर झाला. चिन्मय आणि नेहा तर केंव्हाच पुढे निघून गेले होते. (त्यामुळे नंतर त्यांना वाई मध्ये आमची वाट बघत बसावं लागलं. बिचाऱ्या चिन्मयची तर खूप चीडचीड झाली :D  :D )


            संध्याकाळी ४.३० ला आम्ही विष्णूबुवांकडे पोहोचलो. खूपच उशीर झालेला होता. जेवण करून निघे पर्येंत ६ वाजून गेले होते. आम्ही गाडी गडाच्या पायथ्याशी जिथेपर्येंत रस्ता जातो तिथे पर्येंत नेली. आपापल्या Bags घेऊन चालायला सुरु करणार तोच, माझा Camera विष्णूबुवांच्या घरी राहिल्याचं लक्षात आलं . बाकी सगळ्यांना तिथेच थांबायला सांगून मी आणि प्रद्युम्न परत जाऊन Camera घेऊन आलो, आणि गड चढायला सुरुवात केली. या सगळ्यात आणखी अर्धा तास मोडला.


कमळगड [समुद्रसपाटी पासून उंची ४२०० फूट] - वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रायरेश्वर, केंजळगड अश्या सर्व ठिकाणां  वरून धोम धरणाच्या पाण्यामध्ये दिसणारे हे पाषाणपुष्प, कमळगड म्हणून प्रचलित आहे. हा किल्ला पूर्वी  भेळंजा आणि कत्तलगड या नावांनी सुद्धा ओळखला जात असे. या गडाचा निर्माता अज्ञात आहे. विजापूर च्या मोकासदाराच्या अंमलाखालील हा गड आजूबाजूच्या केंजळगड, पांडवगड, वैराटगड यांच्या बरोबरीनेच मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. नंतर एप्रिल १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या Maj. Thatcher ने हा किल्ला ताब्यात घेतला. ब्रिटीश सरकारच्या काळात या किल्ल्यावर युद्धबंद्यांना मृत्यूदंड दिला जात असे. गेरूची (काव) विहीर हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. या विहिरी व्यतिरिक्त इथे काही नाही असा समज आहे, पण आमच्या आत्तापर्येंतच्या दोन भेटीत आम्हाला बालेकिल्ल्यावर गवतात लपलेला तटबंदीचा पाया आणि बालेकिल्ल्याच्या वाटेवर बुरुज सदृश बांधकामाचे अवशेष आढळले आहेत.


विष्णुबुवा पुढे आणि आम्ही मागे मागे अशी गड चढायला सुरुवात केली.

            चढाईला सुरुवात  करून १५ मिनिटं पण झाली नाहीत तोपर्येंत मंडळी गळपाटली पण थोडा वेळ थांबत थोडा वेळ चढत आम्ही चढाई सुरु ठेवली. हळू हळू अंधारून यायला सुरु झालं होतं. जस जसा अंधार वाढू लागला आमच्या बरोबरची नवखी मंडळी थोडी घाबरू लागली. त्यात आम्ही तिघे तर बरेच पुढे गेलो, पण इतर चार जण मात्र बरेच मागे पडले. आधीच अंधार पडलेला, त्यात ते दिसेनासे झाले. म्हणून आम्ही होतो तिथेच थांबून त्यांना हाका मारत होतो. त्यांचं फक्त आलो आलो २ मिनिटं ५ मिनिटं ईतकच प्रत्युत्तर येत होतं. बऱ्याच वेळाने ते आले, तेव्हा कळलं प्रद्युम्न "डबा टाकायला" गेला होता, आणि पठ्ठ्या निवांत सगळा प्रोग्राम आवरून आला होता.

 तो आल्यावर परत चढायला सुरुवात केली. एव्हाना आम्ही बरेच वर आलो होतो. गडाच्या कमळ माचीच्या आधी बऱ्यापैकी सपाट टप्पा लागतो. तिथे पोहोचल्यावर आम्ही घटकाभर विश्रांती घेतली. त्या टप्प्यावरून एका बाजूला खालच्या वासोळे गावातले दिवे चमकत होते. तर दुसऱ्या बाजूला दूरवर महाबळेश्वर दिसत होते. दुरूनच त्या बलशाली महाबळेश्वराला वंदन करून सर्वांनी ॐकाराचा जप केला. केलेला ॐकार, महाबळेश्वरावरून येणारी थंडगार हवा, आणि फलाहार यामुळे पुन्हा ताजे तवाने होऊन "हर हर महादेव" चा घोष करत आम्ही पुनश्च चढाई सुरु केली. आणि १५-२० मिनिटांतच  गडाच्या माचीच्या एका टोकाशी असलेल्या गोरक्षनाथांच्या मंदिरात पोहोचलो.

           
वरती पोहोचल्यावर नाथांना मनोभावे नमस्कार करून काही वेळ तिथेच बसून पुन्हा ॐकार केला. आणि मंदिराच्या बाजूच्या खोलीत आलो. हीच तर होती आमच्या मुक्कामाची जागा. ह्या खोलीत नाथांच्या धुनीचे कुंड आहे, आम्ही पहिलं काम काय केलं असेल, तर हि धुनी प्रज्वलित करण्याच्या उद्योगाला लागलो. धुनी प्रज्वलित झाल्यावर….… मग काय ? विठोबा झाला, आता पोटोबा…. मंदिराच्या बाहेर बसुन सगळ्यांनी मेथीच्या ठेपल्यांवर ताव मारला . पोटोबा झाल्यावर शेंगा खात खात आम्ही स्मरणशक्तीचे खेळ खेळायला सुरुवात केली. तासभर खेळून झाल्यावर आम्ही आत जाऊन निद्रादेवी ला शरण गेलो.

            सकाळी मला लवकरच जाग आली, पाहिलं तर सगळे अजून साखर झोपेत होते, मी उठून मंदिराच्या बाहेर फेरफटका मारायला गेलो. समोर महाबळेश्वरावर मस्त ढग उतरले होते. मागच्या बाजूचा केंजळगड पण अदृश्य झालेला होता. पण अशी काही थंडी होती कि जास्त वेळ हिंडताच येईना, म्हणून परत खोलीत आलो. तोपर्यंत काही मावळे उठलेले होते, बाकीच्यांना अर्थातच मागं लागून उठवावं लागलं. सकाळी आवरून झाल्यानंतर, रात्री गड चढताना सुहासने पकडलेल्या काजव्याला सोडून दिलं आणि वरती निघालो, पण परत थांबलो.……….


             का थांबलो ? अहो अजून महत्वाचे काम राहिले होते ना. आम्ही मावळ्यांनी एवढा मोठा गड सर केला भगवा कोण लावणार ? लगेचच कमानी शेजारची जुनी ध्वजाची काठी उतरवली जुना फाटका ध्वज काढला, त्याजागी नवा कोरा ध्वज लावून काठी पुन्हा उभी केली. ध्वजाला वंदन केलं आणि मगच बालेकिल्ल्याकडे जायला निघालो.









        

          बालेकिल्ल्यावर जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो आणि काही वेळाने मोकळा भाग व एक मोठे घर दिसते, इथे धनगराचे एक कुटुंब राहते. या मोकळ्या भागातून पुढे जाताना उजवीकडे बालेकिल्ला दिसत असतो.


             इथले धनगराचे घर हे संपूर्ण गडावर हे एकमेव घर आहे. त्यांच्याकडे चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. इथून पुढच्या वाटेवर डावीकडे झाडीत पडक्या बुरुजा सदृश अवशेष दिसतात. तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळातून वर जाणारा एक रस्ता दिसतो. इथे पूर्वी वर जायला व्यवस्थीत रस्ता असावा हे आजूबाजूच्या तुटक्या फुटक्या पायऱ्या बघितल्यावर लगेचंच लक्षात येतं. बहुदा हे तोडफोडीचे काम Maj. Thatcher नेच केलं असावं. १८१८ मध्ये मराठ्यांचे जवळपास सगळे किल्ले जिंकल्यानंतर त्यांचा पुन्हा वापर होऊ  नये म्हणून ब्रिटिशांनी या किल्ल्यांचे मार्ग उध्वस्त करून टाकले होते. त्यालाच हा कमळगड सुद्धा बळी पडला असावा. तुटलेल्या पायऱ्यांमुळे इथे थोडसं प्रस्तरारोहण करुनंच वर यावं लागतं.

           
             वर येताच अष्टदिशांचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. समोर महाबळेश्वर, डावीकडे पाचगणीचं Table Land , उजवीकडे केंजळगड व रायरेश्वर आणि पाठीमागे धोम धरणाचा अथांग जलाशय आणि त्याच्या पलीकडे दिसणारा पांडवगड.






           

          याच बालेकिल्ल्यावर आहे प्रसिद्ध गेरू, म्हणजेच कावेची विहीर. कावेच्या विहिरीत नंतर उतरायचे ठरवून आम्ही समोरच्या टोकाकडे जायला निघालो. इथे असलेला ध्वज सुद्धा फाटलेला होता. आम्ही असताना तो फाटलेला ध्वज तसाच कसा राहील ? लगेच नवीन ध्वज Bag मधून बाहेर आला आणि काही वेळातच "हर हर महादेव" "जय भवानी - जय शिवाजी" च्या गजरात त्या खोर्‍याच्या सर्वोच्च बिंदूवर भगवा डौलाने फडकू लागला.




            तो भगवा पाहता पाहताच ऊर आणि डोळेसुद्धा भरून आले. हा भगवा असाच डौलाने फडकत रहावा म्हणून अगदी याच्या निर्मिती पासून याच्या रक्षणासाठी, सन्मानासाठी लढणाऱ्या आणि प्रसंगी जीव देणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन केले. तिथली माती मस्तकी लावली आणि शपथ घेतली की इथून पुढे ज्या गड, किल्ले वा मंदिरांना भेट देऊ तिथला ध्वज जर खराब झाला असेल तर तिथे नवीन ध्वज लावू.









      
           नंतर आम्ही परत कावेच्या विहिरीकडे वळलो. जमिनीच्या पोटात खोल खोल जाणाऱ्या कावेच्या विहिरीत उतरणे हा अनुभव थरारक आहे. आपण जसजसे खाली उतरत जातो तसा तसा हवेतला गारवा वाढत जातो. तळाशी पोहोचल्यावर चहुबाजूला आपल्याला लाल काव दिसते. तिथे असताना सहजच मनात विचार आला. शिवराज्याभिषेकावेळी रायगडावर रंगरंगोटी करायला इथली काव नेली असेल का ? कुणाला माहिती ? कदाचित नेली सुद्धा असेल. ईतिहास सगळ्या गोष्टी सांगत नाही. इतक्या detail मध्ये तर नाहीच नाही.


            या कावेच्या विहिरीमधून बाहेर येउन आम्ही पुन्हा एकदा सर्व मुलुखावर नजर टाकली आणि बालेकिल्ल्यावरून खाली आलो. परत धनगराच्या घरी येउन त्यांनी केलेला मसाले भात खाल्ला आणि त्यांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला लागलो. तिथून निघतानाच आणखी ३ जण तिथे आले, ते म्हणाले आम्ही रस्ता चुकलेलो फार काट्याकुट्यातून आलो. त्यांनी पुढे बालेकिल्ल्याकडे जायचा रस्ता विचारला. त्यांना रस्ता सांगून आम्ही पुढे निघालो.


            परताना आमची नजर वळून वळून पुन्हा त्या भगव्या कडेच जात होती.





            जाता जाता आम्हाला अजून एक काम करायचं होतं. ते म्हणजे गडावर जाण्याचा रस्ता दाखवणाऱ्या खुणा करणे. इथे जंगल झाडी खूप आहे, मागच्या वेळी आम्ही सुद्धा रस्ता चुकलो होतो. यावेळी आम्ही बरोबर आलो पण मगाशी वर भेटलेल्यांनी रस्ता चुकल्याचं सांगितलं. तसंच उतरताना आणखी एक ग्रुप भेटला, त्यांनी सुद्धा आम्हाला रस्ता विचारला. ते बिचारे पण खूप लांबून आले होते. ही दोन उदाहरणं तिथेच मिळाल्यामूळे आम्हाला खात्री झाली की  आम्ही करत असलेल्या या "मार्ग"दर्शनाचा आमच्या सारख्या भटक्यांना नक्कीच उपयोग होणार.  










          गड उतरत बरेच खाली आल्यावर वाटेत हे महाशय चिन्मय ला दिसले. आणि परत  एकदा जाणीव झाली की आम्ही त्यांच्याच राज्यात आहोत. मित्रांनो यांच्या राज्यात हिंडताना खूप सावध रहा. यांच्याशी मस्ती करायला तर बिलकुल जाऊ नका. अश्या ठिकाणी या छोट्याश्या विंचवाचा दंश सुद्धा जीवघेणा ठरू शकतो. 



मित्रांनो कसा वाटला कमळगड ? जरूर सांगा… 
तुम्ही जर कमळगडावर गेलात तर जाताना आम्ही केलेल्या मार्गदर्शक खुणा कितपत उपयुक्त आहेत ते जरूर कळवा. तुमच्या आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे. 



महाराष्ट्राचा इतिहास सांगत, सह्याद्री असे उभा खडा |
त्याला भेटून येताना मात्र, ओलाविती आमुच्या नेत्र कडा ||
शिवछत्रपती दैवत आमुचे, आम्हीच त्यांचे मावळे खरे |
शिव-शंभूचे पराक्रम सांगत, साद देती सह्यशिखरे ||




धन्यवाद !!!

Sunday, June 15, 2014

साद देती सह्यशिखरे.....

            सध्या नित्य नूतन हिंडणे सुरु आहे. एक चांगला group पण तयार झालाय. नुकतीच केंजळगडची मोहीम सुद्धा झाली (त्यासंबंधीची post लवकरच टाकतोय). जमलेला group, भटकंती आणि blog बहुतेक या सगळ्याच्या एकंदर परिणाम कि काय ? माहिती नाही, पण आमच्या सौ. ना कविता एक सुचली. ती इथे share करतोय. तुमचाही अभिप्राय जरूर कळवा.


या मातीशी आमुचे नाते, दऱ्या कड्यांची ओढ सांगे | 
निसर्गा संगतीच आम्हां, स्वर्ग सुखाची चाहूल लागे ||

हरपून भूक तहान, विसरून देहभान |
गाठणे गडमाथा, हाच आमुचा सन्मान ||

केवळ भटकणे अन फिरणे, जरी असे हाच छंद |
धडपडूनही न थांबणे, हाच आमुचा आनंद ||

सह्यभ्रमंतीच्या ह्या क्षणांची, करितो मनी साठवण |
तरीही क्षुधा शांत न होई, फिरुनी येई आठवण ||

महाराष्ट्राचा इतिहास सांगत, सह्याद्री असे उभा खडा |
त्याला भेटून येताना मात्र, ओलाविती आमुच्या नेत्र कडा ||

शिवछत्रपती दैवत आमुचे, आम्हीच त्यांचे मावळे खरे |
शिव-शंभूचे पराक्रम सांगत, साद देती सह्यशिखरे ||

                                                                          
                                                                            - सौ. अर्जिता आदित्य गोखले.


Thursday, March 13, 2014

मढेघाट, भोर आणि मटण मसाला वाली भेळ. (गुंजवणे मावळ रॉक्स)

( काही कारणामुळे या पोस्ट मध्ये फोटो टाकू शकत नाहीये पुढच्या पोस्ट शक्यतो फोटोसह असतील )

शनिवारी संध्याकाळी

चिन्मय घरी आलेला बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही काहीतरी हादडायला बाहेर पडलो . तेव्हा पाणीपुरी खाताना चिन्मय म्हणाला चल  उद्या कुठेतरी भटकायला जाऊया. पण माझा काही केल्या मूड होत नव्हता. तो चल  म्हणून मागे लागलेला. पण शेवटी नाही नाही म्हणून त्याला गप्प बसवण्यात मी यश मिळवलं. पोटोबा झाल्यावर तो घरी गेला आणि मी सुद्धा घरी येउन निद्रादेवीच्या अधीन झालो.

रविवार सकाळ.

          ऑफिस ला जायचं  tension नसल्यामुळे निवांत ९.३० ला उठलो. जाग आल्या आल्याच काय झालं माहिती नाही, पण अंथरुणातून उठायच्या आधीच चिन्मय ला फोन लावला पठ्ठ्या अजून झोपेतच होता, त्याला म्हणालो कुठे जायचं  असेल तर १०.३० पर्येंत घरी ये. साहेब ११.३० ला घरी आले.आम्ही लगेच निघालो डोक्यात होता मढेघाट आणि सिंहगड तोरणा आणि राजगड सारख्या किल्ल्यांचं जवळून  दर्शन. खडकवासल्यापासून पुढे सिंहगड ढगांमध्ये लपंडाव खेळत होता. आणि त्याच्यावरचे towers तर पूर्णवेळ गायबच होते. त्यामुळे आम्हाला without  towers सिंहगड पाहायला मिळाला. सिंहगडाचं असं  दर्शन देणाऱ्या त्या  ढगांना धन्यवाद देत आम्ही पुढे निघालो.  खानापूर पासून डावीकडे आमची स्वारी पाबे घाटाकडे वळली. सिंहगडाला वळसा घालत आम्ही पुढे जात होतो. इथे पावसाची अपेक्षा होती पण आमचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला. पण घाट संपून पुढे आम्ही वेल्ह्याकडे वळणार तोच जोरदार पावसाने आमचं स्वागत केलं. आणि त्या वरुणराजानं आमचं तोरण्याचं दृश्य हिरावून घेतलं. पुढे गुंजवणे धरणाला बगल देत आम्ही पुढे गेलो आणि दाट ढगांनी आमचं स्वागत केलं. राजगड सुद्धा तोरण्यासारखाच ढगांत हरवला होता. पुढे पासली गावाजवळ दिशादर्शक फलक होता त्यावर लिहिले होते " <--- भोर ६० "  "इकडून भोर ला जायला रस्ता आहे ?" चिन्मय आणि माझ्या तोंडून एकाच वेळेला प्रश्न बाहेर पडला. तिकडे जाणारा रस्ता पहिला तर अगदी छोटासा आणि झाडीत लपलेला असा होता. पण आमच्या डोळ्यापुढे सध्या मढे  घाट  असल्यामुळे आम्ही पुढे निघालो. मढे  घाट जिथून  खाली उतरतो त्या जागेच्या थोडे अलीकडेच bike लावली कारण पुढे चिखलाने रस्ता खूपच खराब झालेला. पुढे चालत कड्याकडे निघालो . जाताना जागोजागी चालू असलेल्या दारू पार्ट्या बघून खूप वाईट वाटलं. आपल्या स्वराज्याच्या शिलेदारांचा राबता असलेला मढे घाट. तानाजी मालुसरेंच्या मृत्यु नंतर त्यांना ज्या वाटेने त्यांच्या उमरठे गावी नेण्यात आले ती हि वाट. अश्या जागी दारूच्या पार्ट्या आणि हिडीस कृत्ये करताना ह्या लोकांना लाज कशी वाटत नाही ? अर्थात इतिहासाशी देणं घेणं नसलेल्या आजच्या पिढीला अश्या जागांच महत्व आणि पावित्र्य समजतंच नसेल तर काय बोलणार ? पण ह्या तळीरामांचा काहीतरी बंदोबस्त व्हायला हवा.  आम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करत कड्यावर जाऊन पोहचलो . खालच्या खोऱ्यातला  उदंड मुलुख नजरेत भरत होता पलीकडे वरंध घाटाचे डोंगर दिसत होते.  समोरच्या मुलुखाचे निरीक्षण करताना मनात विचार येत होते.  या डोंगरांच्या पलीकडेच मालुसरेंचे उमरठे. समोरच्या डोंगरांच्या कुशीतच कुठेतरी समर्थांची शिवथर घळ. आणि वरंध घाटाचा संरक्षक दुर्ग कावळ्या किल्ला. माझी नजर या सगळ्याच्या खाणाखुणा शोधत होती तेवढ्यात ढगांनी समोरच्या दृश्यावर पडदा टाकला आणि अवती भोवती एकच धवल रंग दिसू लागला. मागे पहिले तर मागचे तळीराम पण ढगात गायब झालेले. तिथल्या अप्रतिम निसर्गाचा, पावसाचा आणि ढगांचा आनंद घेऊन आम्ही परत फिरलो जाताना डावीकडे एका पडक्या घरातून आवाज आला " ओ चा पायजे का ? " बघितला तर साधारण १०-१२ वर्षाची मुले चहा विकत होती. इतक्या थंडी आणि पावसात कोणी चहा पाहिजे का विचारतंय, कोण नाही म्हणेल ? आणि तसं  पण म्हणतात ना कि " सावाशिनीनं कुकवाला आनं मर्दानं च्या ला नाय म्हनायचं नसतं" आम्ही चहा घेतला. शाळेला रविवार ची सुट्टी म्हणून सुट्टीच्या दिवशी चहा विकून चार पैकं मिळवणाऱ्या त्या पोरांचं कौतुक वाटलं.  चहा घेऊन बाईक काढली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

           "भोर ६० -->" पुन्हा बोर्ड दिसला. चिन्मय ला विचारलं जायचं का ? चिन्मय confused. मी म्हणालो toss  करूया. त्यावर चिन्मय "toss केला तरी आपण जायचं तिकडेच जाणार" चिन्मयचं हे वाक्य ऐकताच toss चा विचार cancel करून आम्ही भोर कडे जाणाऱ्या  चिंचोळ्या रस्त्यावर वळलो.  तिकडे वळून थोडाच वेळ झाला आणि चिन्मय म्हणाला आदित्य भूक लागलीय. आणि माझ्या लक्षात आलं  कि मला पण भूक लागलीय. पण त्या रस्त्यावर जिथे माणूस सुद्धा मोठ्या मुश्किलीने दिसत होता इथे कसलं दुकान आणि कसलं  हॉटेल ? मी चिन्मय ला म्हणालो भोर मध्ये गेल्यावर खाऊ काहीतरी. अंदाज होता तासाभरात भोर ला पोहचू. पण पुढे डांबरी रस्ता संपला आणि फक्त दगड गोट्यांचा रस्ता राहिला साहजिकच बाईक ची गती मंदावली. पुढे जवळपास ३० कि मी रस्ता असाच होता आणि ते अंतर पार करायला आम्हाला जवळपास ४ तास लागले. पुढे चांगला रस्ता चालू झाला आणि तितक्यात आम्हाला एक टपरी दिसली शेजारी एका फळकुटावर लिहिले होते "चहा भेळ  बुर्जी मिळेल" हे वाचून सकाळपासून भुकेलेला आणि गेले ५-६ तास पावसात भिजत असलेला कोण शहाणा थांबणार नाही ? बाईक आपसूकच थांबली. आणि आमचा भ्रम दूर झाला कारण ती टपरी नव्हती ते तिथले एक सुपर मार्केट होते. प्रत्येक गोष्ट त्या दुकानात उपलब्ध होती. आणि दुकानदार शिकलेला तर होताच वर त्याने cooking apron घातलेला पाहून surprised  झालो. भेळ  आमच्या प्रचंड आवडीचा विषय असल्याने त्याला विचारले भेळ आहे का ? तो म्हणाला "आहे पण बिन चिरमुऱ्याची आहे." आम्ही विचारले म्हणजे काय प्रकार आहे ? तो म्हणाला "हि मी बनवलेली रेसिपी आहे. तुम्ही खाऊन बघा आणि मग पैसे द्या. १४ दिवस वेगवेगळे  प्रयोग करून हि रेसिपी बनवलेली आहे." आम्ही खाऊन  तर बघु  म्हणून दोन भेळ  द्यायला सांगितल्या. भेळेत त्याने फरसाण, मक्याचा चिवडा, कांदा, मिरची या बरोबर मटण  मसाला आणि tomato  sauce  घातला. हे आमच्यासाठी आणखी एक surprise  होतं. भेळ तयार करताना तो म्हणाला कि माझी हि रेसिपी इंटरनेट वर सुद्धा उपलब्ध आहे. माझ्या मित्रांनी  टाकलीय (त्याने जी website रेसिपी साठी सांगितलेली ती काही मिळाली नाही मिळाल्यास नक्की देईन) नंतर आणखी एक भेळ खाऊन, आणि काही गप्पा गोष्टी नंतर त्या खुळे  आडनावाच्या शहाण्या माणसाचा निरोप घेऊन आम्ही भोर कडे निघालो. लवकरच आम्ही भोर कापूरहोळ रस्त्याला लागलो. आमच्या बाईक चा इतका वेळ असलेला ताशी १० कि मी चा जास्तीत जास्त वेग ७० पर्येंत गेला. दीड तासात घरी पोहचून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो ……. 

नित्य नूतन हिंडावे

नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे ।

ज्यांच्या पायी माझी उदंड भक्ती जडलेली आहे. अश्या रामदास स्वामींचे हे सांगणे मी आणि माझ्या माहितीतली इतर टाळकी अतिशय भक्तिभावाने पाळतो. भटकणे आमचा छंद आहे, आमचा धर्म आहे, आमची नशा आहे. खास करून जिथे फार कोणी जात नाही अश्या ठिकाणी आम्ही मात्र हमखास जातो. बरेचवेळा त्यासाठी कसलंही planning नसतं. काल असेच येड्यासारखे भटकून आलो. येताना एक वेगळीच भेळ अनपेक्षित ठिकाणी खायला मिळाली. दिवसभराचा experience सॉलिड होताच. त्यामुळे विचार आला कि आपण जगावेगळे अनुभव तर घेतंच आहोत तर हे अनुभव इतरांबरोबर share करायला काय हरकत आहे ? लगेच हा विचार मी चिन्मय (ह्या प्राण्याशी नंतर ओळख होईलच) ला बोलून दाखवला. झालं लगेच ठरलं ब्लॉग चालू करायचा. तर अशी हि या ब्लॉग  च्या जन्माची कहाणी. इतर भटकंतीच्या गोष्टी तुमच्यासमोर वेळोवेळी सादर होत राहतीलच. 

(कालची स्टोरी लवकरच पोस्ट करतोय)

धन्यवाद ….