" भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा"

Friday, March 14, 2014

किल्ले तुंग अर्थात कठीणगड

रविवार अजून दोन तीन दिवस लांब होता. पण अर्जिता आणि माझ्या मनात सारखा घोळत होता तो "कठीणगड" म्हणजेच किल्ले तुंग. मग काय ? मोहीम करायची तर मावळे नकोत ? सगळ्यांना फोनाफोनी करून शनिवारी रात्री पर्येंत ५ जण तयार झाले. मी, अर्जिता, चिन्मय, मिनाक्षी आणि राकेश.

रविवार सकाळ

सगळे माझ्या घरी जमे पर्येंत ९ वाजून गेले होते. म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही लगेचच निघालो. नांदे गावापासून पुढे वर्षानुवर्षे खराब असलेला रस्ता अगदी व्यवस्थित झाल्याचे पाहून बर वाटलं. आणि मनातच म्हटलं कि या निवडणुका दरवर्षी का येत नाहीत ? कारण रस्ता व्यवस्थित होण्यामागचं खरं कारण मला कळलं होतं. पण चांगल्या रस्त्याच्या कृपेने आमचा बराच वेळ वाचला व लवकरच आम्ही कोळवण जवळ पोहचलो. कोळवण जवळच आम्हाला Painted Storks म्हणजेच चित्रबलक या पक्षांची जोडी आकाशात घिरट्या घालताना दिसली.

Painted Stork [ चित्रबलक ]

कोळवण चा चिन्मय विभूती आश्रम ओलांडताच उजवीकडे दिसू लागला किल्ले तिकोना आता त्याची सोबत घेत आम्ही जवण गावी पोहचलो.

कोळवण जवळून दिसणारा तिकोणा
मिनाक्षी आणि राकेश यांना अपरिचीत असणारा तिकोणा त्यांना दुरूनच दाखवला आणि आम्ही डावीकडे तुंग ची वाट धरली. तिकोणा आता मागे पडत चालला होता आणि कठीणगडाचे पवना धरणाच्या जलाशया बरोबरचे दृश्य मनाला भुरळ घालीत होते. त्या दृश्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही बाईक बाजूला घेताच होतो कि एक लांब सडक साप रस्ता ओलांडून सळसळत निघून गेला. त्याचबरोबर मनाला जाणीव झाली कि आपण शहरात नाही तर आपण या जीवांच्या हक्काच्या मावळात आहोत.  पुढे वळणावळणांचा रस्ता पार करत थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो.

जवण येथून दिसणारा किल्ले तुंग.

समोर आव्हान देत होता कठीणगड चा नावाप्रमाणे कठीण, खडा चढ.

किल्ले तुंग [ समुद्रसपाटीपासून  उंची ३००० फूट] :-
पवना मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, तिकोणा, पवना मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

इतिहास :- या किल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झालं. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मी १६६५ रोजी तुंग आणि तिकोणा या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ च्या पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबाद्खानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. लवकरच हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला आणि ब्रिटीश राजवट येईपर्येंत मराठ्यांच्याच ताब्यात होता.

कोळवण मार्गे पुणे - पवनानगर रस्त्यावर जवण येथे मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळल्यावर तुंगी गावाकडे जाणारा रस्ता लागतो. मोर्वी गाव ओलांडल्यावर पुढे उजवीकडे वळावे, तुंगी गावाच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्यावर जाणारी वाट दाखवणारी पाटी लावली आहे. तुंग किल्ल्याचे दुसरे नाव 'कठीणगड' का ठेवले गेले असावे, हे पायथ्यापासून दिसणारा खडा चढ पाहिल्यावर लगेच ध्यानी येते. किल्ल्याची पायथ्यापासून अदमासे हजार बाराशे फुटांचा उभा चढ आहे.

किल्ले तुंग पायथ्यापासून

  चढावर आधी हनुमानाचे मंदिर आहे.


किल्ल्याच्या वाटेतील हनुमान


पुढे गडाचा प्रथम दरवाजा लागतो. [सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने श्रमदान करून गडाची डागडुजी तसेच  गडावर येणारी वाट सध्या बरीच सुकर केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार.]

आम्ही किल्ल्याच्या प्रथम दरवाजात
येथून सरळ एक वाट किल्ल्याच्या मावळती कडेच्या बुरुजाकडे जाते.  या बुरुजाकडे सहसा कोणी जात नाही. या वाटेवरून जाताना अतिशय काळजी घ्यावी लागते. वाट वापरत नसल्याने वाटेवर अनेक छोटे दगड आहेत ज्यांच्यावरून पाय घसरण्याची शक्यता असते. मी, अर्जिता आणि चिन्मय अतिशय काळजीपूर्वक येथून जात होतो. वाटेचा अवघड भाग नुकताच संपला होता आणि एका दगडात पाय अडकून मी लोटांगण घातलं. माझ्या हनुवटीला आणि खांद्यांना दुखापत झाली. पण नशीब हेच जर मी १०-१५ फूट आधी पडलो असतो तर सरळ हजार फूट खोल दरीत गेलो असतो. नवख्या माणसांनी ह्या बुरुजाकडे जाण्याचे धाडस करू नये. ती वाट अतिशय धोकादायक आहे. मावळती कडच्या बुरुजावरून परत आल्यावर गडाच्या दुसऱ्या दरवाजा कडे वळावं. हा गोमुखी बांधणीचा दरवाजा अधिक भक्कम भासतो. येथून आत आल्यावर आपण गडमाथ्यावर पोहचतो उजवीकडे गणपतीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर सदरेचे अवशेष आहेत. मागे पाण्याचं टाकं आहे मात्र सध्या येथील पाणी पिण्यायोग्य नाही. येथूनच मागे बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आहे.

माथ्यावरून दिसणारा बालेकिल्ला
बालेकिल्ल्याच्या वाटेवर पहिला टप्प्यावर आलो कि उजवीकडे एक वाट जाते. या वाटेवर पिण्यायोग्य पाण्याचं टाकं आहे. हा किल्ल्यावर स्वच्छ पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. इथे अक्षरशः जमिनीवर झोपून टाक्यातलं पाणी काढावं लागतं. जागा कमी असून सुद्धा पाणी जवळ असल्यामुळे आम्ही येथेच पोटोबा करायला बसलो. आमचं खाणं नुकतंच झालं होतं आणि अजून आमची विश्रांती चालू होती. समोरच्याच दगडावर मला सरडा दिसला होता, मी त्याचे फोटो घेण्यात मग्न होतो.  तितक्यात अर्जिताच्या मागे मला पानांची हालचाल जाणवली म्हणून मी तिकडे पाहिलं तर एक साप अर्जिताच्या बरोबर मागे येऊन थांबला होता.

त्या नंतरचे आमचे संभाषण जसे च्या तसे.

मी : अर्जिता उठ पटकन.
अर्जिता : कशाला ?  आत्ताच बसलेय ना मी.
मी : अर्जिता उठ....
अर्जिता : मी नाही जा.....
मी : अर्जिता तुझ्या मागे साप आहे.

हे ऐकल्या बरोबर आमच्या सौ. दुसऱ्या सेकंदाला पलीकडच्या दगडावर होत्या. आणि सर्प महाशय जवळच्या झाडावर चढले.

हाच तो साप [Buff Strip Keelback, नानेटी]
सकाळपासून दोनदा झालेलं सर्पदर्शन आणि माझं पडणं याचा मानसिक परिणाम या सगळ्यासाठी नवीन असणाऱ्या राकेश आणि मिनाक्षी वर झाला होता. आता ते तिथे क्षणभर सुद्धा थांबायला तयार नव्हते. राकेश तर वरती बालेकिल्ल्यावर सुद्धा यायला तयार नव्हता. पण आम्ही जबरदस्ती त्याला वरती घेऊन गेलो. हा गडाचा सर्वोच्च बिंदू आहे. गडमाथा छोटा असल्यामुळे तासा दीड तासात सर्व गड पाहून होतो. इथून गडाला तिन्ही बाजूने वेढणारा पवना जलाशय, लोहगड, विसापूर, तिकोणा सहज दिसतात. आणि हवामान चांगलं असेल तर नैऋत्य दिशेस जांभुळी डोंगर रांगेच्या पलीकडे कोरीगडाचा माथा दृष्टीस पडतो. वरून दिसणारी दृश्य मनात साठवून आम्ही आता परतीच्या वाटेवर लागलो.

वाटेत दिसणारा तिकोणा जणू काही मला म्हणत होता " आता मला कधी भेटायला येणार ? "
"लवकरच " असं मनातल्या मनात त्याच्याशी बोलून मी त्याचाही निरोप घेतला.

Thursday, March 13, 2014

मढेघाट, भोर आणि मटण मसाला वाली भेळ. (गुंजवणे मावळ रॉक्स)

( काही कारणामुळे या पोस्ट मध्ये फोटो टाकू शकत नाहीये पुढच्या पोस्ट शक्यतो फोटोसह असतील )

शनिवारी संध्याकाळी

चिन्मय घरी आलेला बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही काहीतरी हादडायला बाहेर पडलो . तेव्हा पाणीपुरी खाताना चिन्मय म्हणाला चल  उद्या कुठेतरी भटकायला जाऊया. पण माझा काही केल्या मूड होत नव्हता. तो चल  म्हणून मागे लागलेला. पण शेवटी नाही नाही म्हणून त्याला गप्प बसवण्यात मी यश मिळवलं. पोटोबा झाल्यावर तो घरी गेला आणि मी सुद्धा घरी येउन निद्रादेवीच्या अधीन झालो.

रविवार सकाळ.

          ऑफिस ला जायचं  tension नसल्यामुळे निवांत ९.३० ला उठलो. जाग आल्या आल्याच काय झालं माहिती नाही, पण अंथरुणातून उठायच्या आधीच चिन्मय ला फोन लावला पठ्ठ्या अजून झोपेतच होता, त्याला म्हणालो कुठे जायचं  असेल तर १०.३० पर्येंत घरी ये. साहेब ११.३० ला घरी आले.आम्ही लगेच निघालो डोक्यात होता मढेघाट आणि सिंहगड तोरणा आणि राजगड सारख्या किल्ल्यांचं जवळून  दर्शन. खडकवासल्यापासून पुढे सिंहगड ढगांमध्ये लपंडाव खेळत होता. आणि त्याच्यावरचे towers तर पूर्णवेळ गायबच होते. त्यामुळे आम्हाला without  towers सिंहगड पाहायला मिळाला. सिंहगडाचं असं  दर्शन देणाऱ्या त्या  ढगांना धन्यवाद देत आम्ही पुढे निघालो.  खानापूर पासून डावीकडे आमची स्वारी पाबे घाटाकडे वळली. सिंहगडाला वळसा घालत आम्ही पुढे जात होतो. इथे पावसाची अपेक्षा होती पण आमचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला. पण घाट संपून पुढे आम्ही वेल्ह्याकडे वळणार तोच जोरदार पावसाने आमचं स्वागत केलं. आणि त्या वरुणराजानं आमचं तोरण्याचं दृश्य हिरावून घेतलं. पुढे गुंजवणे धरणाला बगल देत आम्ही पुढे गेलो आणि दाट ढगांनी आमचं स्वागत केलं. राजगड सुद्धा तोरण्यासारखाच ढगांत हरवला होता. पुढे पासली गावाजवळ दिशादर्शक फलक होता त्यावर लिहिले होते " <--- भोर ६० "  "इकडून भोर ला जायला रस्ता आहे ?" चिन्मय आणि माझ्या तोंडून एकाच वेळेला प्रश्न बाहेर पडला. तिकडे जाणारा रस्ता पहिला तर अगदी छोटासा आणि झाडीत लपलेला असा होता. पण आमच्या डोळ्यापुढे सध्या मढे  घाट  असल्यामुळे आम्ही पुढे निघालो. मढे  घाट जिथून  खाली उतरतो त्या जागेच्या थोडे अलीकडेच bike लावली कारण पुढे चिखलाने रस्ता खूपच खराब झालेला. पुढे चालत कड्याकडे निघालो . जाताना जागोजागी चालू असलेल्या दारू पार्ट्या बघून खूप वाईट वाटलं. आपल्या स्वराज्याच्या शिलेदारांचा राबता असलेला मढे घाट. तानाजी मालुसरेंच्या मृत्यु नंतर त्यांना ज्या वाटेने त्यांच्या उमरठे गावी नेण्यात आले ती हि वाट. अश्या जागी दारूच्या पार्ट्या आणि हिडीस कृत्ये करताना ह्या लोकांना लाज कशी वाटत नाही ? अर्थात इतिहासाशी देणं घेणं नसलेल्या आजच्या पिढीला अश्या जागांच महत्व आणि पावित्र्य समजतंच नसेल तर काय बोलणार ? पण ह्या तळीरामांचा काहीतरी बंदोबस्त व्हायला हवा.  आम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करत कड्यावर जाऊन पोहचलो . खालच्या खोऱ्यातला  उदंड मुलुख नजरेत भरत होता पलीकडे वरंध घाटाचे डोंगर दिसत होते.  समोरच्या मुलुखाचे निरीक्षण करताना मनात विचार येत होते.  या डोंगरांच्या पलीकडेच मालुसरेंचे उमरठे. समोरच्या डोंगरांच्या कुशीतच कुठेतरी समर्थांची शिवथर घळ. आणि वरंध घाटाचा संरक्षक दुर्ग कावळ्या किल्ला. माझी नजर या सगळ्याच्या खाणाखुणा शोधत होती तेवढ्यात ढगांनी समोरच्या दृश्यावर पडदा टाकला आणि अवती भोवती एकच धवल रंग दिसू लागला. मागे पहिले तर मागचे तळीराम पण ढगात गायब झालेले. तिथल्या अप्रतिम निसर्गाचा, पावसाचा आणि ढगांचा आनंद घेऊन आम्ही परत फिरलो जाताना डावीकडे एका पडक्या घरातून आवाज आला " ओ चा पायजे का ? " बघितला तर साधारण १०-१२ वर्षाची मुले चहा विकत होती. इतक्या थंडी आणि पावसात कोणी चहा पाहिजे का विचारतंय, कोण नाही म्हणेल ? आणि तसं  पण म्हणतात ना कि " सावाशिनीनं कुकवाला आनं मर्दानं च्या ला नाय म्हनायचं नसतं" आम्ही चहा घेतला. शाळेला रविवार ची सुट्टी म्हणून सुट्टीच्या दिवशी चहा विकून चार पैकं मिळवणाऱ्या त्या पोरांचं कौतुक वाटलं.  चहा घेऊन बाईक काढली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

           "भोर ६० -->" पुन्हा बोर्ड दिसला. चिन्मय ला विचारलं जायचं का ? चिन्मय confused. मी म्हणालो toss  करूया. त्यावर चिन्मय "toss केला तरी आपण जायचं तिकडेच जाणार" चिन्मयचं हे वाक्य ऐकताच toss चा विचार cancel करून आम्ही भोर कडे जाणाऱ्या  चिंचोळ्या रस्त्यावर वळलो.  तिकडे वळून थोडाच वेळ झाला आणि चिन्मय म्हणाला आदित्य भूक लागलीय. आणि माझ्या लक्षात आलं  कि मला पण भूक लागलीय. पण त्या रस्त्यावर जिथे माणूस सुद्धा मोठ्या मुश्किलीने दिसत होता इथे कसलं दुकान आणि कसलं  हॉटेल ? मी चिन्मय ला म्हणालो भोर मध्ये गेल्यावर खाऊ काहीतरी. अंदाज होता तासाभरात भोर ला पोहचू. पण पुढे डांबरी रस्ता संपला आणि फक्त दगड गोट्यांचा रस्ता राहिला साहजिकच बाईक ची गती मंदावली. पुढे जवळपास ३० कि मी रस्ता असाच होता आणि ते अंतर पार करायला आम्हाला जवळपास ४ तास लागले. पुढे चांगला रस्ता चालू झाला आणि तितक्यात आम्हाला एक टपरी दिसली शेजारी एका फळकुटावर लिहिले होते "चहा भेळ  बुर्जी मिळेल" हे वाचून सकाळपासून भुकेलेला आणि गेले ५-६ तास पावसात भिजत असलेला कोण शहाणा थांबणार नाही ? बाईक आपसूकच थांबली. आणि आमचा भ्रम दूर झाला कारण ती टपरी नव्हती ते तिथले एक सुपर मार्केट होते. प्रत्येक गोष्ट त्या दुकानात उपलब्ध होती. आणि दुकानदार शिकलेला तर होताच वर त्याने cooking apron घातलेला पाहून surprised  झालो. भेळ  आमच्या प्रचंड आवडीचा विषय असल्याने त्याला विचारले भेळ आहे का ? तो म्हणाला "आहे पण बिन चिरमुऱ्याची आहे." आम्ही विचारले म्हणजे काय प्रकार आहे ? तो म्हणाला "हि मी बनवलेली रेसिपी आहे. तुम्ही खाऊन बघा आणि मग पैसे द्या. १४ दिवस वेगवेगळे  प्रयोग करून हि रेसिपी बनवलेली आहे." आम्ही खाऊन  तर बघु  म्हणून दोन भेळ  द्यायला सांगितल्या. भेळेत त्याने फरसाण, मक्याचा चिवडा, कांदा, मिरची या बरोबर मटण  मसाला आणि tomato  sauce  घातला. हे आमच्यासाठी आणखी एक surprise  होतं. भेळ तयार करताना तो म्हणाला कि माझी हि रेसिपी इंटरनेट वर सुद्धा उपलब्ध आहे. माझ्या मित्रांनी  टाकलीय (त्याने जी website रेसिपी साठी सांगितलेली ती काही मिळाली नाही मिळाल्यास नक्की देईन) नंतर आणखी एक भेळ खाऊन, आणि काही गप्पा गोष्टी नंतर त्या खुळे  आडनावाच्या शहाण्या माणसाचा निरोप घेऊन आम्ही भोर कडे निघालो. लवकरच आम्ही भोर कापूरहोळ रस्त्याला लागलो. आमच्या बाईक चा इतका वेळ असलेला ताशी १० कि मी चा जास्तीत जास्त वेग ७० पर्येंत गेला. दीड तासात घरी पोहचून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो ……. 

नित्य नूतन हिंडावे

नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे ।

ज्यांच्या पायी माझी उदंड भक्ती जडलेली आहे. अश्या रामदास स्वामींचे हे सांगणे मी आणि माझ्या माहितीतली इतर टाळकी अतिशय भक्तिभावाने पाळतो. भटकणे आमचा छंद आहे, आमचा धर्म आहे, आमची नशा आहे. खास करून जिथे फार कोणी जात नाही अश्या ठिकाणी आम्ही मात्र हमखास जातो. बरेचवेळा त्यासाठी कसलंही planning नसतं. काल असेच येड्यासारखे भटकून आलो. येताना एक वेगळीच भेळ अनपेक्षित ठिकाणी खायला मिळाली. दिवसभराचा experience सॉलिड होताच. त्यामुळे विचार आला कि आपण जगावेगळे अनुभव तर घेतंच आहोत तर हे अनुभव इतरांबरोबर share करायला काय हरकत आहे ? लगेच हा विचार मी चिन्मय (ह्या प्राण्याशी नंतर ओळख होईलच) ला बोलून दाखवला. झालं लगेच ठरलं ब्लॉग चालू करायचा. तर अशी हि या ब्लॉग  च्या जन्माची कहाणी. इतर भटकंतीच्या गोष्टी तुमच्यासमोर वेळोवेळी सादर होत राहतीलच. 

(कालची स्टोरी लवकरच पोस्ट करतोय)

धन्यवाद ….