" भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा"

Wednesday, December 21, 2016

पाषाणपुष्प - कमळगड

            "कमळगड लवकरच" - बरेच दिवस भ्रमणमंडळाच्या Whatsapp Group चा हाच Subject  होता.


            शेवटी मुहूर्त लागला आणि जायचा दिवस उजाडला. हो नाही करत करत ७ वीर या मोहिमेसाठी तयार झाले. पैकी मी, प्रद्युम्न, सुहास, मकरंद, सायली गाडीतून आणि चिन्मय, नेहा Bike वरून येणार असं ठरलं . सकाळी लवकर निघून पायथ्याशी  असलेल्या तुपेवाडी जवळ राहणाऱ्या विष्णूबुवां कडं जेवायचं, मग तासभर विश्रांती घेऊन गड चढायला सुरु करायचं असं ठरलं होतं. पण नेमकी सकाळी काही कामं लागल्यामुळं मलाच आवरायला उशीर झाला. चिन्मय आणि नेहा तर केंव्हाच पुढे निघून गेले होते. (त्यामुळे नंतर त्यांना वाई मध्ये आमची वाट बघत बसावं लागलं. बिचाऱ्या चिन्मयची तर खूप चीडचीड झाली :D  :D )


            संध्याकाळी ४.३० ला आम्ही विष्णूबुवांकडे पोहोचलो. खूपच उशीर झालेला होता. जेवण करून निघे पर्येंत ६ वाजून गेले होते. आम्ही गाडी गडाच्या पायथ्याशी जिथेपर्येंत रस्ता जातो तिथे पर्येंत नेली. आपापल्या Bags घेऊन चालायला सुरु करणार तोच, माझा Camera विष्णूबुवांच्या घरी राहिल्याचं लक्षात आलं . बाकी सगळ्यांना तिथेच थांबायला सांगून मी आणि प्रद्युम्न परत जाऊन Camera घेऊन आलो, आणि गड चढायला सुरुवात केली. या सगळ्यात आणखी अर्धा तास मोडला.


कमळगड [समुद्रसपाटी पासून उंची ४२०० फूट] - वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रायरेश्वर, केंजळगड अश्या सर्व ठिकाणां  वरून धोम धरणाच्या पाण्यामध्ये दिसणारे हे पाषाणपुष्प, कमळगड म्हणून प्रचलित आहे. हा किल्ला पूर्वी  भेळंजा आणि कत्तलगड या नावांनी सुद्धा ओळखला जात असे. या गडाचा निर्माता अज्ञात आहे. विजापूर च्या मोकासदाराच्या अंमलाखालील हा गड आजूबाजूच्या केंजळगड, पांडवगड, वैराटगड यांच्या बरोबरीनेच मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. नंतर एप्रिल १८१८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या Maj. Thatcher ने हा किल्ला ताब्यात घेतला. ब्रिटीश सरकारच्या काळात या किल्ल्यावर युद्धबंद्यांना मृत्यूदंड दिला जात असे. गेरूची (काव) विहीर हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. या विहिरी व्यतिरिक्त इथे काही नाही असा समज आहे, पण आमच्या आत्तापर्येंतच्या दोन भेटीत आम्हाला बालेकिल्ल्यावर गवतात लपलेला तटबंदीचा पाया आणि बालेकिल्ल्याच्या वाटेवर बुरुज सदृश बांधकामाचे अवशेष आढळले आहेत.


विष्णुबुवा पुढे आणि आम्ही मागे मागे अशी गड चढायला सुरुवात केली.

            चढाईला सुरुवात  करून १५ मिनिटं पण झाली नाहीत तोपर्येंत मंडळी गळपाटली पण थोडा वेळ थांबत थोडा वेळ चढत आम्ही चढाई सुरु ठेवली. हळू हळू अंधारून यायला सुरु झालं होतं. जस जसा अंधार वाढू लागला आमच्या बरोबरची नवखी मंडळी थोडी घाबरू लागली. त्यात आम्ही तिघे तर बरेच पुढे गेलो, पण इतर चार जण मात्र बरेच मागे पडले. आधीच अंधार पडलेला, त्यात ते दिसेनासे झाले. म्हणून आम्ही होतो तिथेच थांबून त्यांना हाका मारत होतो. त्यांचं फक्त आलो आलो २ मिनिटं ५ मिनिटं ईतकच प्रत्युत्तर येत होतं. बऱ्याच वेळाने ते आले, तेव्हा कळलं प्रद्युम्न "डबा टाकायला" गेला होता, आणि पठ्ठ्या निवांत सगळा प्रोग्राम आवरून आला होता.

 तो आल्यावर परत चढायला सुरुवात केली. एव्हाना आम्ही बरेच वर आलो होतो. गडाच्या कमळ माचीच्या आधी बऱ्यापैकी सपाट टप्पा लागतो. तिथे पोहोचल्यावर आम्ही घटकाभर विश्रांती घेतली. त्या टप्प्यावरून एका बाजूला खालच्या वासोळे गावातले दिवे चमकत होते. तर दुसऱ्या बाजूला दूरवर महाबळेश्वर दिसत होते. दुरूनच त्या बलशाली महाबळेश्वराला वंदन करून सर्वांनी ॐकाराचा जप केला. केलेला ॐकार, महाबळेश्वरावरून येणारी थंडगार हवा, आणि फलाहार यामुळे पुन्हा ताजे तवाने होऊन "हर हर महादेव" चा घोष करत आम्ही पुनश्च चढाई सुरु केली. आणि १५-२० मिनिटांतच  गडाच्या माचीच्या एका टोकाशी असलेल्या गोरक्षनाथांच्या मंदिरात पोहोचलो.

           
वरती पोहोचल्यावर नाथांना मनोभावे नमस्कार करून काही वेळ तिथेच बसून पुन्हा ॐकार केला. आणि मंदिराच्या बाजूच्या खोलीत आलो. हीच तर होती आमच्या मुक्कामाची जागा. ह्या खोलीत नाथांच्या धुनीचे कुंड आहे, आम्ही पहिलं काम काय केलं असेल, तर हि धुनी प्रज्वलित करण्याच्या उद्योगाला लागलो. धुनी प्रज्वलित झाल्यावर….… मग काय ? विठोबा झाला, आता पोटोबा…. मंदिराच्या बाहेर बसुन सगळ्यांनी मेथीच्या ठेपल्यांवर ताव मारला . पोटोबा झाल्यावर शेंगा खात खात आम्ही स्मरणशक्तीचे खेळ खेळायला सुरुवात केली. तासभर खेळून झाल्यावर आम्ही आत जाऊन निद्रादेवी ला शरण गेलो.

            सकाळी मला लवकरच जाग आली, पाहिलं तर सगळे अजून साखर झोपेत होते, मी उठून मंदिराच्या बाहेर फेरफटका मारायला गेलो. समोर महाबळेश्वरावर मस्त ढग उतरले होते. मागच्या बाजूचा केंजळगड पण अदृश्य झालेला होता. पण अशी काही थंडी होती कि जास्त वेळ हिंडताच येईना, म्हणून परत खोलीत आलो. तोपर्यंत काही मावळे उठलेले होते, बाकीच्यांना अर्थातच मागं लागून उठवावं लागलं. सकाळी आवरून झाल्यानंतर, रात्री गड चढताना सुहासने पकडलेल्या काजव्याला सोडून दिलं आणि वरती निघालो, पण परत थांबलो.……….


             का थांबलो ? अहो अजून महत्वाचे काम राहिले होते ना. आम्ही मावळ्यांनी एवढा मोठा गड सर केला भगवा कोण लावणार ? लगेचच कमानी शेजारची जुनी ध्वजाची काठी उतरवली जुना फाटका ध्वज काढला, त्याजागी नवा कोरा ध्वज लावून काठी पुन्हा उभी केली. ध्वजाला वंदन केलं आणि मगच बालेकिल्ल्याकडे जायला निघालो.









        

          बालेकिल्ल्यावर जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जातो आणि काही वेळाने मोकळा भाग व एक मोठे घर दिसते, इथे धनगराचे एक कुटुंब राहते. या मोकळ्या भागातून पुढे जाताना उजवीकडे बालेकिल्ला दिसत असतो.


             इथले धनगराचे घर हे संपूर्ण गडावर हे एकमेव घर आहे. त्यांच्याकडे चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. इथून पुढच्या वाटेवर डावीकडे झाडीत पडक्या बुरुजा सदृश अवशेष दिसतात. तसेच थोडे पुढे गेल्यावर कातळातून वर जाणारा एक रस्ता दिसतो. इथे पूर्वी वर जायला व्यवस्थीत रस्ता असावा हे आजूबाजूच्या तुटक्या फुटक्या पायऱ्या बघितल्यावर लगेचंच लक्षात येतं. बहुदा हे तोडफोडीचे काम Maj. Thatcher नेच केलं असावं. १८१८ मध्ये मराठ्यांचे जवळपास सगळे किल्ले जिंकल्यानंतर त्यांचा पुन्हा वापर होऊ  नये म्हणून ब्रिटिशांनी या किल्ल्यांचे मार्ग उध्वस्त करून टाकले होते. त्यालाच हा कमळगड सुद्धा बळी पडला असावा. तुटलेल्या पायऱ्यांमुळे इथे थोडसं प्रस्तरारोहण करुनंच वर यावं लागतं.

           
             वर येताच अष्टदिशांचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. समोर महाबळेश्वर, डावीकडे पाचगणीचं Table Land , उजवीकडे केंजळगड व रायरेश्वर आणि पाठीमागे धोम धरणाचा अथांग जलाशय आणि त्याच्या पलीकडे दिसणारा पांडवगड.






           

          याच बालेकिल्ल्यावर आहे प्रसिद्ध गेरू, म्हणजेच कावेची विहीर. कावेच्या विहिरीत नंतर उतरायचे ठरवून आम्ही समोरच्या टोकाकडे जायला निघालो. इथे असलेला ध्वज सुद्धा फाटलेला होता. आम्ही असताना तो फाटलेला ध्वज तसाच कसा राहील ? लगेच नवीन ध्वज Bag मधून बाहेर आला आणि काही वेळातच "हर हर महादेव" "जय भवानी - जय शिवाजी" च्या गजरात त्या खोर्‍याच्या सर्वोच्च बिंदूवर भगवा डौलाने फडकू लागला.




            तो भगवा पाहता पाहताच ऊर आणि डोळेसुद्धा भरून आले. हा भगवा असाच डौलाने फडकत रहावा म्हणून अगदी याच्या निर्मिती पासून याच्या रक्षणासाठी, सन्मानासाठी लढणाऱ्या आणि प्रसंगी जीव देणाऱ्या ज्ञात अज्ञात वीरांना अभिवादन केले. तिथली माती मस्तकी लावली आणि शपथ घेतली की इथून पुढे ज्या गड, किल्ले वा मंदिरांना भेट देऊ तिथला ध्वज जर खराब झाला असेल तर तिथे नवीन ध्वज लावू.









      
           नंतर आम्ही परत कावेच्या विहिरीकडे वळलो. जमिनीच्या पोटात खोल खोल जाणाऱ्या कावेच्या विहिरीत उतरणे हा अनुभव थरारक आहे. आपण जसजसे खाली उतरत जातो तसा तसा हवेतला गारवा वाढत जातो. तळाशी पोहोचल्यावर चहुबाजूला आपल्याला लाल काव दिसते. तिथे असताना सहजच मनात विचार आला. शिवराज्याभिषेकावेळी रायगडावर रंगरंगोटी करायला इथली काव नेली असेल का ? कुणाला माहिती ? कदाचित नेली सुद्धा असेल. ईतिहास सगळ्या गोष्टी सांगत नाही. इतक्या detail मध्ये तर नाहीच नाही.


            या कावेच्या विहिरीमधून बाहेर येउन आम्ही पुन्हा एकदा सर्व मुलुखावर नजर टाकली आणि बालेकिल्ल्यावरून खाली आलो. परत धनगराच्या घरी येउन त्यांनी केलेला मसाले भात खाल्ला आणि त्यांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला लागलो. तिथून निघतानाच आणखी ३ जण तिथे आले, ते म्हणाले आम्ही रस्ता चुकलेलो फार काट्याकुट्यातून आलो. त्यांनी पुढे बालेकिल्ल्याकडे जायचा रस्ता विचारला. त्यांना रस्ता सांगून आम्ही पुढे निघालो.


            परताना आमची नजर वळून वळून पुन्हा त्या भगव्या कडेच जात होती.





            जाता जाता आम्हाला अजून एक काम करायचं होतं. ते म्हणजे गडावर जाण्याचा रस्ता दाखवणाऱ्या खुणा करणे. इथे जंगल झाडी खूप आहे, मागच्या वेळी आम्ही सुद्धा रस्ता चुकलो होतो. यावेळी आम्ही बरोबर आलो पण मगाशी वर भेटलेल्यांनी रस्ता चुकल्याचं सांगितलं. तसंच उतरताना आणखी एक ग्रुप भेटला, त्यांनी सुद्धा आम्हाला रस्ता विचारला. ते बिचारे पण खूप लांबून आले होते. ही दोन उदाहरणं तिथेच मिळाल्यामूळे आम्हाला खात्री झाली की  आम्ही करत असलेल्या या "मार्ग"दर्शनाचा आमच्या सारख्या भटक्यांना नक्कीच उपयोग होणार.  










          गड उतरत बरेच खाली आल्यावर वाटेत हे महाशय चिन्मय ला दिसले. आणि परत  एकदा जाणीव झाली की आम्ही त्यांच्याच राज्यात आहोत. मित्रांनो यांच्या राज्यात हिंडताना खूप सावध रहा. यांच्याशी मस्ती करायला तर बिलकुल जाऊ नका. अश्या ठिकाणी या छोट्याश्या विंचवाचा दंश सुद्धा जीवघेणा ठरू शकतो. 



मित्रांनो कसा वाटला कमळगड ? जरूर सांगा… 
तुम्ही जर कमळगडावर गेलात तर जाताना आम्ही केलेल्या मार्गदर्शक खुणा कितपत उपयुक्त आहेत ते जरूर कळवा. तुमच्या आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे. 



महाराष्ट्राचा इतिहास सांगत, सह्याद्री असे उभा खडा |
त्याला भेटून येताना मात्र, ओलाविती आमुच्या नेत्र कडा ||
शिवछत्रपती दैवत आमुचे, आम्हीच त्यांचे मावळे खरे |
शिव-शंभूचे पराक्रम सांगत, साद देती सह्यशिखरे ||




धन्यवाद !!!

Monday, June 23, 2014

लोणारची अद्भुत दुनिया [भाग १]

अवनी मंडले पुण्यं जंबुद्वीपं युधिष्ठीर | जंबुद्वीपात्पुण्यतमं भारतं दंडकं तत: ||
दंडकात्परमं परम क्षेत्रं विरजम् पितृवत्सलम् | विरजा पुण्यतमं क्षेत्रं कलौ मातृगृहम् स्फुटम् ||
 

बरेच दिवसांपासून शेगांवला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचं मनात होतं, चिन्मयभाऊ बरोबर होतेच. आता इतक्या लांब जात आहोत तर जवळपास आणखी काही ठिकाणे आहेत का ? याचा शोध घेऊ लागलो. आणि आम्हाला सापडलं ते घाणेकरांच्या भाषेतलं नवलतीर्थ "लोणार". 

झालं Plan ठरला.... संध्याकाळच्या बस ने शेगांव ला जायचं महाराजांचं दर्शन घ्यायचं, दुसऱ्या दिवशी लोणार बघून परत शेगांव ला येऊन रात्रीच्या बस ने पुण्याला यायचं. 

ठरल्या प्रमाणे आम्ही सकाळी शेगांव ला पोहचलो. मंदिरा जवळच एका हॉटेल मध्ये रूम घेतली. [ इथे भक्तनिवास आहे. पण आम्ही मित्र मित्र गेलो होतो म्हणून आम्हाला खोली मिळाली नाही. सह कुटुंब गेल्यासच तेथे खोली मिळते] आंघोळ वगैरे आटोपून महाराजांच्या दर्शनाला गेलो. फारशी गर्दी नसल्याने पटकन दर्शन झालं. नंतर आमचा शोध सुरु झाला तो शेगांव च्या कचोरी साठी. "ती" सुप्रसिद्ध ओरिजिनल कचोरी नक्की कुठली ते मात्र दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी १०-१५ कचोरी खाऊन सुद्धा आम्हाला कळालं नाही. दुसरा दिवस उजाडला. आम्ही मात्र उशिरा उठलो. आणि आपल्याला प्रचंड उशीर झाला आहे हे कळताच गडबडीने आवरून आम्ही ST stand गाठलं. Direct लोणार ला जाणारी बस केव्हांच गेली होती. मग काय ? खामगांव, मेहकर अश्या मजला मारत आम्ही लोणार ला येऊन पोहचलो. एव्हाना १२ वाजून गेले होते. आणि आम्हांला पुण्यासाठी ९.३० ची गाडी शेगांव वरून पकडायची होती. त्यामुळे आमच्याकडे ७ पर्येंत वेळ होता.   

लोणार...


तुम्ही म्हणाल कुठे सह्याद्री आणि कुठे लोणार ? हो.. खरंतर या ठिकाणाचा आणि सह्याद्रीचा भौगोलिक दृष्टया काहीही संबंध नाही. मात्र ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टया खुप जवळचा संबंध आहे. आणि म्हणूनच तर आम्ही इथे आलो होतो.

लोणार नगराचा सर्वात जुना उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. त्यातील मधुमता नावाचे नगर म्हणजेच लोणार आहे. इथे असलेल्या भोगावती कुंडात श्री रामाने स्नान केले आहे तसेच रामकुंडावर दशरथाने स्नान केले होते. पांडवांच्या काळात राजा युधिष्ठीराने येथे वडिलांचे श्राद्ध केले. 

सम्राट अशोकाच्या साम्राज्यात लोणार होते. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याच्या मार्गावर हे महत्वाचे स्थळ होते. त्यामुळे यास दक्षिणद्वार म्हटले गेले आहे. वाकाटक राजांच्या काळात येथील धारे जवळचे सूर्यमंदिर [देवी मंदिर], नृसिंह मंदिर, धारेचा घाट इत्यादी तयार झाले. सातवाहन राजांच्या काळातही लोणारला महत्व होते. राष्ट्रकुट राजांच्या काळात सितान्हाणी समोरचे कुमारेश्वर मंदिर तयार झाले. चालुक्य व होयसाळ यांचेही हे ठाणे होते. उत्तर चालुक्य राजा विक्रमादित्य यांनी प्रसिद्ध दैत्यसूदन मंदिर ११ व्या शतकात बांधले. तर होयसाळ राजांनी पापहरेश्वर मंदिर बांधले. कमळजा देवीचे मंदिरही साधारण याच काळात बांधले गेले.
यादवांच्या काळात वरील मंदिरांची डागडुजी व विवरातील शिवमंदिरे बांधली गेली. अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणानंतर अनेक शतके लोणारचा इतिहास अंधारात राहिला.

लोणार ST stand वरून चालतंच आम्ही पोहचलो ते प्रसिद्ध (?) दैत्यसूदन मंदिरात.

दैत्यसूदन मंदिर.

१८७८ सालापर्येंत हे मंदिर अज्ञात होते. इथे फक्त एक मातीची टेकडी होती. १८७८ साली येथे उत्खनन झाल्यानंतर मंदिराचा शोध लागला. वास्तुशिल्पाचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर उत्तराभिमुख असून त्याचा आकार ताऱ्यासारखा आहे. ह्याचा निर्मिती काल निश्चितपणे १२४१ पूर्वीचा आहे. नवीन संशोधनानुसार हे मंदिर उत्तर चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा म्हणजे विजयादित्य याने त्याच्या पत्नीच्या आग्रहास्तव त्रिभुवनकीर्ती नावाच्या शिल्पज्ञाच्या आराखड्यानुसार बांधले आहे.




दैत्यसूदन मंदिर






   हे मंदिर पाहताक्षणीच मला नृसिंहवाडी जवळ असलेल्या खिद्रापूरच्या मंदिराची आठवण झाली.

खिद्रापूरच्या मंदिराप्रमाणेच हे मंदिर देखील त्रिस्तरीय प्रकारचे आहे. गर्भगृहात विष्णूची मूर्ती आहे. त्यांच्या पायाखाली लावणासूर हात जोडून मोक्ष मागत आहे.

विष्णू मूर्ती - दैत्यसूदन मंदिर

हि मूर्ती मूळची नाही मंदिराचा शोध लागला तेव्हा गाभाऱ्यात मूर्ती नव्हती. [बहुदा अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणावेळी ती नष्ट झाली असावी अथवा लुटून नेली असावी] नंतर नागपूरकर भोसले यांनी स्वामी सच्चीताश्रम यांच्या सल्ल्यानुसार सध्याची मूर्ती बनविली. हि मूर्ती सुद्धा निजामाच्या काळात भग्न झालेली आहे. नंतरच्या काळात देवाच्या डोळ्यातील मौल्यवान रत्ने सुद्धा चोरीला गेली.

गर्भगृहाच्या वरच्या बाजूस  गंधर्वयुग्म आकाश मार्गे चर्चा करीत जात आहेत. अप्सरा नृत्य करीत आहेत अशी शिल्पे आहेत. अंतराळगृहात छतावर लावणासूर वध कथा, गंगाभोगावती चे शिल्प आहे. लावणासूर वध शिल्पात लावतासूर हात जोडत आहे आणि त्याच्या पोटावर पाय देऊन विष्णू रागाने पहात आहे.

अंतराळगृहाच्या पुढे मोठे सभागृह आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस सुंदर शिल्पे आहेत. मुख्य मंडपाच्या व्हरांड्या खालच्या दुसऱ्या पायरीवर " शके ११६३ कान्हेदेव मंदिरास आले" असा शिलालेख आहे.


मंदिराची जोती सहा स्तरीय आहेत. पहिले दोन स्तर शुभ रांगोळी सारखे आहेत, तिसऱ्या स्तरावर गोपद्मे आहेत, चौथा स्तर हंसपट्टीचा आहे. पाचव्या स्तरावर कमल कलिका आहेत तर सहावा स्तर कीर्तीमुखांचा आहे


पूर्वी हे मंदिर साधारण ५६ फूट उंचीचे असावे. बाहेरील बाजूस काही शिल्पे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. ती पुढीलप्रमाणे.

१. नागराज मैथुन २. वराह ३. मैथुन शिल्पे ४. शीवायनी शिल्प ५. नैऋत्य राक्षस शिल्प

राधा कृष्ण
 ६. राधा कृष्ण शिल्प 

७. मैथुन शिल्प ८. शिपाई ९. देवकी वासुदेव व पहारेकरी शिल्प १०. विष्णू ११. आदित्य नारायण १२. कुत्र्यासह भैरव व वैलीवेष्टित मैथुन शिल्प

चामुंडा देवी शिल्प


१३. [कोनाड्यात] चामुंडा देवी शिल्प 

१४. धनुष्य व परशु धारक परशुराम १५. तंतुवाद्य वादिनी १६. शंकर - गळ्यात मुंडमाळ [अंधासूर वध कथा]

दर्पण सुंदरी
१७. दर्पण सुंदरी 

१८. विषकन्या १९ ब्रम्हचारी

इराणचा सूर्य
 २०. [मागील कोनाड्यात] सूर्य या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हे इराण मध्ये बनवले गेले होते. या सूर्याच्या पायात बूट आहेत. व एका हातात कमलपुष्प व दुसऱ्या हातात राजदंड आहे. पायाशी अंधार दूर करण्या करिता उषा आणि प्रत्युषा बाण मारीत आहेत. भारतीय सूर्याच्या पायात पादत्राणे नसतात तसेच दोन्ही हातात कमल अथवा कमल कलिका असतात. हे शिल्प म्हणजे इराणचा तत्कालीन राजा खुश्रो आणि विजयादित्य यांच्या व्यापार आणि मैत्रीचे प्रतिक आहे.

२१. सूर्यनमस्कार घालणारा ब्रम्हचारी २२. वाद्य वादिनी २३. ब्रम्हा विष्णू महेश

नृसिंह
२४. [कोनाड्यात] नृसिंह

 २५. द्वारपालिका हातात चाकू सारखे हत्यार २६.शेषासह विष्णू २७. मातृशिल्प

द्वारपाल पट्टीका
२८. द्वारपाल पट्टीका

२९. सवाद्य नृत्य ३०. युद्ध - भारतीय व इराणी योद्धा ३१. वामन अवतार

रेवती बलराम कृतीका
 ३२.रेवती बलराम कृतीका

३३. गंगादेवी

महिषासुरमर्दिनी
३४. महिषासुरमर्दिनी

 ३५. राम लक्ष्मण सीता ३६. लक्ष्मी नारायण ३७. द्वारपाल ३८. मुष्टियुद्ध ३९. बलराम शिल्प.

इतर काही प्रकाशचित्रे...






मंदिराची सद्यस्थिती

१. सरोवराच्या खाऱ्या पाण्यामुळे मंदिर शिल्पांना नुकसान होत होते. म्हणून अलीकडेच शिल्पांवर पॉलीथीनचे अच्छादन केले गेले आहे, पण
२. मंदिर परिसर अतिशय अस्वच्छ आहे. [स्वच्छतेसाठी प्रशासनाने लक्ष घातले पाहिजे]
३. आजूबाजूला बरीच मुसलमान वस्ती आहे, तेथील लोक शौचास म्हणून मंदिराच्या आवारात येतात. [हा प्रकार चीड आणणारा आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने असे प्रकार थांबवावेत.]
४. मंदिराकडे जाण्याची वाट शोधत गल्लीबोळातून जावे लागते, [गैरसोय टाळण्यासाठी मार्गदर्शक फलक लावणे गरजेचे आहे.]

मंदिर शिल्पांचे निरीक्षण करून आम्ही त्या विख्यात, जगात एकमेव अश्या असलेल्या सरोवराकडे निघालो.

क्रमशः [भाग २ मध्ये]

संदर्भग्रंथ : लोणार दर्शन - विज्ञान, कला-पुराण व इतिहास - प्रा. सुधाकर बुगदाणे 

Sunday, June 15, 2014

साद देती सह्यशिखरे.....

            सध्या नित्य नूतन हिंडणे सुरु आहे. एक चांगला group पण तयार झालाय. नुकतीच केंजळगडची मोहीम सुद्धा झाली (त्यासंबंधीची post लवकरच टाकतोय). जमलेला group, भटकंती आणि blog बहुतेक या सगळ्याच्या एकंदर परिणाम कि काय ? माहिती नाही, पण आमच्या सौ. ना कविता एक सुचली. ती इथे share करतोय. तुमचाही अभिप्राय जरूर कळवा.


या मातीशी आमुचे नाते, दऱ्या कड्यांची ओढ सांगे | 
निसर्गा संगतीच आम्हां, स्वर्ग सुखाची चाहूल लागे ||

हरपून भूक तहान, विसरून देहभान |
गाठणे गडमाथा, हाच आमुचा सन्मान ||

केवळ भटकणे अन फिरणे, जरी असे हाच छंद |
धडपडूनही न थांबणे, हाच आमुचा आनंद ||

सह्यभ्रमंतीच्या ह्या क्षणांची, करितो मनी साठवण |
तरीही क्षुधा शांत न होई, फिरुनी येई आठवण ||

महाराष्ट्राचा इतिहास सांगत, सह्याद्री असे उभा खडा |
त्याला भेटून येताना मात्र, ओलाविती आमुच्या नेत्र कडा ||

शिवछत्रपती दैवत आमुचे, आम्हीच त्यांचे मावळे खरे |
शिव-शंभूचे पराक्रम सांगत, साद देती सह्यशिखरे ||

                                                                          
                                                                            - सौ. अर्जिता आदित्य गोखले.


Friday, March 14, 2014

किल्ले तुंग अर्थात कठीणगड

रविवार अजून दोन तीन दिवस लांब होता. पण अर्जिता आणि माझ्या मनात सारखा घोळत होता तो "कठीणगड" म्हणजेच किल्ले तुंग. मग काय ? मोहीम करायची तर मावळे नकोत ? सगळ्यांना फोनाफोनी करून शनिवारी रात्री पर्येंत ५ जण तयार झाले. मी, अर्जिता, चिन्मय, मिनाक्षी आणि राकेश.

रविवार सकाळ

सगळे माझ्या घरी जमे पर्येंत ९ वाजून गेले होते. म्हणून जास्त वेळ न घालवता आम्ही लगेचच निघालो. नांदे गावापासून पुढे वर्षानुवर्षे खराब असलेला रस्ता अगदी व्यवस्थित झाल्याचे पाहून बर वाटलं. आणि मनातच म्हटलं कि या निवडणुका दरवर्षी का येत नाहीत ? कारण रस्ता व्यवस्थित होण्यामागचं खरं कारण मला कळलं होतं. पण चांगल्या रस्त्याच्या कृपेने आमचा बराच वेळ वाचला व लवकरच आम्ही कोळवण जवळ पोहचलो. कोळवण जवळच आम्हाला Painted Storks म्हणजेच चित्रबलक या पक्षांची जोडी आकाशात घिरट्या घालताना दिसली.

Painted Stork [ चित्रबलक ]

कोळवण चा चिन्मय विभूती आश्रम ओलांडताच उजवीकडे दिसू लागला किल्ले तिकोना आता त्याची सोबत घेत आम्ही जवण गावी पोहचलो.

कोळवण जवळून दिसणारा तिकोणा
मिनाक्षी आणि राकेश यांना अपरिचीत असणारा तिकोणा त्यांना दुरूनच दाखवला आणि आम्ही डावीकडे तुंग ची वाट धरली. तिकोणा आता मागे पडत चालला होता आणि कठीणगडाचे पवना धरणाच्या जलाशया बरोबरचे दृश्य मनाला भुरळ घालीत होते. त्या दृश्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही बाईक बाजूला घेताच होतो कि एक लांब सडक साप रस्ता ओलांडून सळसळत निघून गेला. त्याचबरोबर मनाला जाणीव झाली कि आपण शहरात नाही तर आपण या जीवांच्या हक्काच्या मावळात आहोत.  पुढे वळणावळणांचा रस्ता पार करत थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो.

जवण येथून दिसणारा किल्ले तुंग.

समोर आव्हान देत होता कठीणगड चा नावाप्रमाणे कठीण, खडा चढ.

किल्ले तुंग [ समुद्रसपाटीपासून  उंची ३००० फूट] :-
पवना मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, तिकोणा, पवना मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो.

इतिहास :- या किल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झालं. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मी १६६५ रोजी तुंग आणि तिकोणा या भागातील अनेक गावे जाळली पण, हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. १२ जून १६६५ च्या पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबाद्खानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. लवकरच हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला आणि ब्रिटीश राजवट येईपर्येंत मराठ्यांच्याच ताब्यात होता.

कोळवण मार्गे पुणे - पवनानगर रस्त्यावर जवण येथे मुख्य रस्ता सोडून डावीकडे वळल्यावर तुंगी गावाकडे जाणारा रस्ता लागतो. मोर्वी गाव ओलांडल्यावर पुढे उजवीकडे वळावे, तुंगी गावाच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्यावर जाणारी वाट दाखवणारी पाटी लावली आहे. तुंग किल्ल्याचे दुसरे नाव 'कठीणगड' का ठेवले गेले असावे, हे पायथ्यापासून दिसणारा खडा चढ पाहिल्यावर लगेच ध्यानी येते. किल्ल्याची पायथ्यापासून अदमासे हजार बाराशे फुटांचा उभा चढ आहे.

किल्ले तुंग पायथ्यापासून

  चढावर आधी हनुमानाचे मंदिर आहे.


किल्ल्याच्या वाटेतील हनुमान


पुढे गडाचा प्रथम दरवाजा लागतो. [सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने श्रमदान करून गडाची डागडुजी तसेच  गडावर येणारी वाट सध्या बरीच सुकर केली आहे त्याबद्दल त्यांचे आभार.]

आम्ही किल्ल्याच्या प्रथम दरवाजात
येथून सरळ एक वाट किल्ल्याच्या मावळती कडेच्या बुरुजाकडे जाते.  या बुरुजाकडे सहसा कोणी जात नाही. या वाटेवरून जाताना अतिशय काळजी घ्यावी लागते. वाट वापरत नसल्याने वाटेवर अनेक छोटे दगड आहेत ज्यांच्यावरून पाय घसरण्याची शक्यता असते. मी, अर्जिता आणि चिन्मय अतिशय काळजीपूर्वक येथून जात होतो. वाटेचा अवघड भाग नुकताच संपला होता आणि एका दगडात पाय अडकून मी लोटांगण घातलं. माझ्या हनुवटीला आणि खांद्यांना दुखापत झाली. पण नशीब हेच जर मी १०-१५ फूट आधी पडलो असतो तर सरळ हजार फूट खोल दरीत गेलो असतो. नवख्या माणसांनी ह्या बुरुजाकडे जाण्याचे धाडस करू नये. ती वाट अतिशय धोकादायक आहे. मावळती कडच्या बुरुजावरून परत आल्यावर गडाच्या दुसऱ्या दरवाजा कडे वळावं. हा गोमुखी बांधणीचा दरवाजा अधिक भक्कम भासतो. येथून आत आल्यावर आपण गडमाथ्यावर पोहचतो उजवीकडे गणपतीचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर सदरेचे अवशेष आहेत. मागे पाण्याचं टाकं आहे मात्र सध्या येथील पाणी पिण्यायोग्य नाही. येथूनच मागे बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आहे.

माथ्यावरून दिसणारा बालेकिल्ला
बालेकिल्ल्याच्या वाटेवर पहिला टप्प्यावर आलो कि उजवीकडे एक वाट जाते. या वाटेवर पिण्यायोग्य पाण्याचं टाकं आहे. हा किल्ल्यावर स्वच्छ पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. इथे अक्षरशः जमिनीवर झोपून टाक्यातलं पाणी काढावं लागतं. जागा कमी असून सुद्धा पाणी जवळ असल्यामुळे आम्ही येथेच पोटोबा करायला बसलो. आमचं खाणं नुकतंच झालं होतं आणि अजून आमची विश्रांती चालू होती. समोरच्याच दगडावर मला सरडा दिसला होता, मी त्याचे फोटो घेण्यात मग्न होतो.  तितक्यात अर्जिताच्या मागे मला पानांची हालचाल जाणवली म्हणून मी तिकडे पाहिलं तर एक साप अर्जिताच्या बरोबर मागे येऊन थांबला होता.

त्या नंतरचे आमचे संभाषण जसे च्या तसे.

मी : अर्जिता उठ पटकन.
अर्जिता : कशाला ?  आत्ताच बसलेय ना मी.
मी : अर्जिता उठ....
अर्जिता : मी नाही जा.....
मी : अर्जिता तुझ्या मागे साप आहे.

हे ऐकल्या बरोबर आमच्या सौ. दुसऱ्या सेकंदाला पलीकडच्या दगडावर होत्या. आणि सर्प महाशय जवळच्या झाडावर चढले.

हाच तो साप [Buff Strip Keelback, नानेटी]
सकाळपासून दोनदा झालेलं सर्पदर्शन आणि माझं पडणं याचा मानसिक परिणाम या सगळ्यासाठी नवीन असणाऱ्या राकेश आणि मिनाक्षी वर झाला होता. आता ते तिथे क्षणभर सुद्धा थांबायला तयार नव्हते. राकेश तर वरती बालेकिल्ल्यावर सुद्धा यायला तयार नव्हता. पण आम्ही जबरदस्ती त्याला वरती घेऊन गेलो. हा गडाचा सर्वोच्च बिंदू आहे. गडमाथा छोटा असल्यामुळे तासा दीड तासात सर्व गड पाहून होतो. इथून गडाला तिन्ही बाजूने वेढणारा पवना जलाशय, लोहगड, विसापूर, तिकोणा सहज दिसतात. आणि हवामान चांगलं असेल तर नैऋत्य दिशेस जांभुळी डोंगर रांगेच्या पलीकडे कोरीगडाचा माथा दृष्टीस पडतो. वरून दिसणारी दृश्य मनात साठवून आम्ही आता परतीच्या वाटेवर लागलो.

वाटेत दिसणारा तिकोणा जणू काही मला म्हणत होता " आता मला कधी भेटायला येणार ? "
"लवकरच " असं मनातल्या मनात त्याच्याशी बोलून मी त्याचाही निरोप घेतला.

Thursday, March 13, 2014

मढेघाट, भोर आणि मटण मसाला वाली भेळ. (गुंजवणे मावळ रॉक्स)

( काही कारणामुळे या पोस्ट मध्ये फोटो टाकू शकत नाहीये पुढच्या पोस्ट शक्यतो फोटोसह असतील )

शनिवारी संध्याकाळी

चिन्मय घरी आलेला बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही काहीतरी हादडायला बाहेर पडलो . तेव्हा पाणीपुरी खाताना चिन्मय म्हणाला चल  उद्या कुठेतरी भटकायला जाऊया. पण माझा काही केल्या मूड होत नव्हता. तो चल  म्हणून मागे लागलेला. पण शेवटी नाही नाही म्हणून त्याला गप्प बसवण्यात मी यश मिळवलं. पोटोबा झाल्यावर तो घरी गेला आणि मी सुद्धा घरी येउन निद्रादेवीच्या अधीन झालो.

रविवार सकाळ.

          ऑफिस ला जायचं  tension नसल्यामुळे निवांत ९.३० ला उठलो. जाग आल्या आल्याच काय झालं माहिती नाही, पण अंथरुणातून उठायच्या आधीच चिन्मय ला फोन लावला पठ्ठ्या अजून झोपेतच होता, त्याला म्हणालो कुठे जायचं  असेल तर १०.३० पर्येंत घरी ये. साहेब ११.३० ला घरी आले.आम्ही लगेच निघालो डोक्यात होता मढेघाट आणि सिंहगड तोरणा आणि राजगड सारख्या किल्ल्यांचं जवळून  दर्शन. खडकवासल्यापासून पुढे सिंहगड ढगांमध्ये लपंडाव खेळत होता. आणि त्याच्यावरचे towers तर पूर्णवेळ गायबच होते. त्यामुळे आम्हाला without  towers सिंहगड पाहायला मिळाला. सिंहगडाचं असं  दर्शन देणाऱ्या त्या  ढगांना धन्यवाद देत आम्ही पुढे निघालो.  खानापूर पासून डावीकडे आमची स्वारी पाबे घाटाकडे वळली. सिंहगडाला वळसा घालत आम्ही पुढे जात होतो. इथे पावसाची अपेक्षा होती पण आमचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला. पण घाट संपून पुढे आम्ही वेल्ह्याकडे वळणार तोच जोरदार पावसाने आमचं स्वागत केलं. आणि त्या वरुणराजानं आमचं तोरण्याचं दृश्य हिरावून घेतलं. पुढे गुंजवणे धरणाला बगल देत आम्ही पुढे गेलो आणि दाट ढगांनी आमचं स्वागत केलं. राजगड सुद्धा तोरण्यासारखाच ढगांत हरवला होता. पुढे पासली गावाजवळ दिशादर्शक फलक होता त्यावर लिहिले होते " <--- भोर ६० "  "इकडून भोर ला जायला रस्ता आहे ?" चिन्मय आणि माझ्या तोंडून एकाच वेळेला प्रश्न बाहेर पडला. तिकडे जाणारा रस्ता पहिला तर अगदी छोटासा आणि झाडीत लपलेला असा होता. पण आमच्या डोळ्यापुढे सध्या मढे  घाट  असल्यामुळे आम्ही पुढे निघालो. मढे  घाट जिथून  खाली उतरतो त्या जागेच्या थोडे अलीकडेच bike लावली कारण पुढे चिखलाने रस्ता खूपच खराब झालेला. पुढे चालत कड्याकडे निघालो . जाताना जागोजागी चालू असलेल्या दारू पार्ट्या बघून खूप वाईट वाटलं. आपल्या स्वराज्याच्या शिलेदारांचा राबता असलेला मढे घाट. तानाजी मालुसरेंच्या मृत्यु नंतर त्यांना ज्या वाटेने त्यांच्या उमरठे गावी नेण्यात आले ती हि वाट. अश्या जागी दारूच्या पार्ट्या आणि हिडीस कृत्ये करताना ह्या लोकांना लाज कशी वाटत नाही ? अर्थात इतिहासाशी देणं घेणं नसलेल्या आजच्या पिढीला अश्या जागांच महत्व आणि पावित्र्य समजतंच नसेल तर काय बोलणार ? पण ह्या तळीरामांचा काहीतरी बंदोबस्त व्हायला हवा.  आम्ही त्यांच्या कडे दुर्लक्ष करत कड्यावर जाऊन पोहचलो . खालच्या खोऱ्यातला  उदंड मुलुख नजरेत भरत होता पलीकडे वरंध घाटाचे डोंगर दिसत होते.  समोरच्या मुलुखाचे निरीक्षण करताना मनात विचार येत होते.  या डोंगरांच्या पलीकडेच मालुसरेंचे उमरठे. समोरच्या डोंगरांच्या कुशीतच कुठेतरी समर्थांची शिवथर घळ. आणि वरंध घाटाचा संरक्षक दुर्ग कावळ्या किल्ला. माझी नजर या सगळ्याच्या खाणाखुणा शोधत होती तेवढ्यात ढगांनी समोरच्या दृश्यावर पडदा टाकला आणि अवती भोवती एकच धवल रंग दिसू लागला. मागे पहिले तर मागचे तळीराम पण ढगात गायब झालेले. तिथल्या अप्रतिम निसर्गाचा, पावसाचा आणि ढगांचा आनंद घेऊन आम्ही परत फिरलो जाताना डावीकडे एका पडक्या घरातून आवाज आला " ओ चा पायजे का ? " बघितला तर साधारण १०-१२ वर्षाची मुले चहा विकत होती. इतक्या थंडी आणि पावसात कोणी चहा पाहिजे का विचारतंय, कोण नाही म्हणेल ? आणि तसं  पण म्हणतात ना कि " सावाशिनीनं कुकवाला आनं मर्दानं च्या ला नाय म्हनायचं नसतं" आम्ही चहा घेतला. शाळेला रविवार ची सुट्टी म्हणून सुट्टीच्या दिवशी चहा विकून चार पैकं मिळवणाऱ्या त्या पोरांचं कौतुक वाटलं.  चहा घेऊन बाईक काढली आणि परतीच्या प्रवासाला लागलो.

           "भोर ६० -->" पुन्हा बोर्ड दिसला. चिन्मय ला विचारलं जायचं का ? चिन्मय confused. मी म्हणालो toss  करूया. त्यावर चिन्मय "toss केला तरी आपण जायचं तिकडेच जाणार" चिन्मयचं हे वाक्य ऐकताच toss चा विचार cancel करून आम्ही भोर कडे जाणाऱ्या  चिंचोळ्या रस्त्यावर वळलो.  तिकडे वळून थोडाच वेळ झाला आणि चिन्मय म्हणाला आदित्य भूक लागलीय. आणि माझ्या लक्षात आलं  कि मला पण भूक लागलीय. पण त्या रस्त्यावर जिथे माणूस सुद्धा मोठ्या मुश्किलीने दिसत होता इथे कसलं दुकान आणि कसलं  हॉटेल ? मी चिन्मय ला म्हणालो भोर मध्ये गेल्यावर खाऊ काहीतरी. अंदाज होता तासाभरात भोर ला पोहचू. पण पुढे डांबरी रस्ता संपला आणि फक्त दगड गोट्यांचा रस्ता राहिला साहजिकच बाईक ची गती मंदावली. पुढे जवळपास ३० कि मी रस्ता असाच होता आणि ते अंतर पार करायला आम्हाला जवळपास ४ तास लागले. पुढे चांगला रस्ता चालू झाला आणि तितक्यात आम्हाला एक टपरी दिसली शेजारी एका फळकुटावर लिहिले होते "चहा भेळ  बुर्जी मिळेल" हे वाचून सकाळपासून भुकेलेला आणि गेले ५-६ तास पावसात भिजत असलेला कोण शहाणा थांबणार नाही ? बाईक आपसूकच थांबली. आणि आमचा भ्रम दूर झाला कारण ती टपरी नव्हती ते तिथले एक सुपर मार्केट होते. प्रत्येक गोष्ट त्या दुकानात उपलब्ध होती. आणि दुकानदार शिकलेला तर होताच वर त्याने cooking apron घातलेला पाहून surprised  झालो. भेळ  आमच्या प्रचंड आवडीचा विषय असल्याने त्याला विचारले भेळ आहे का ? तो म्हणाला "आहे पण बिन चिरमुऱ्याची आहे." आम्ही विचारले म्हणजे काय प्रकार आहे ? तो म्हणाला "हि मी बनवलेली रेसिपी आहे. तुम्ही खाऊन बघा आणि मग पैसे द्या. १४ दिवस वेगवेगळे  प्रयोग करून हि रेसिपी बनवलेली आहे." आम्ही खाऊन  तर बघु  म्हणून दोन भेळ  द्यायला सांगितल्या. भेळेत त्याने फरसाण, मक्याचा चिवडा, कांदा, मिरची या बरोबर मटण  मसाला आणि tomato  sauce  घातला. हे आमच्यासाठी आणखी एक surprise  होतं. भेळ तयार करताना तो म्हणाला कि माझी हि रेसिपी इंटरनेट वर सुद्धा उपलब्ध आहे. माझ्या मित्रांनी  टाकलीय (त्याने जी website रेसिपी साठी सांगितलेली ती काही मिळाली नाही मिळाल्यास नक्की देईन) नंतर आणखी एक भेळ खाऊन, आणि काही गप्पा गोष्टी नंतर त्या खुळे  आडनावाच्या शहाण्या माणसाचा निरोप घेऊन आम्ही भोर कडे निघालो. लवकरच आम्ही भोर कापूरहोळ रस्त्याला लागलो. आमच्या बाईक चा इतका वेळ असलेला ताशी १० कि मी चा जास्तीत जास्त वेग ७० पर्येंत गेला. दीड तासात घरी पोहचून आम्ही निद्रादेवीच्या अधीन झालो ……. 

नित्य नूतन हिंडावे

नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे ।

ज्यांच्या पायी माझी उदंड भक्ती जडलेली आहे. अश्या रामदास स्वामींचे हे सांगणे मी आणि माझ्या माहितीतली इतर टाळकी अतिशय भक्तिभावाने पाळतो. भटकणे आमचा छंद आहे, आमचा धर्म आहे, आमची नशा आहे. खास करून जिथे फार कोणी जात नाही अश्या ठिकाणी आम्ही मात्र हमखास जातो. बरेचवेळा त्यासाठी कसलंही planning नसतं. काल असेच येड्यासारखे भटकून आलो. येताना एक वेगळीच भेळ अनपेक्षित ठिकाणी खायला मिळाली. दिवसभराचा experience सॉलिड होताच. त्यामुळे विचार आला कि आपण जगावेगळे अनुभव तर घेतंच आहोत तर हे अनुभव इतरांबरोबर share करायला काय हरकत आहे ? लगेच हा विचार मी चिन्मय (ह्या प्राण्याशी नंतर ओळख होईलच) ला बोलून दाखवला. झालं लगेच ठरलं ब्लॉग चालू करायचा. तर अशी हि या ब्लॉग  च्या जन्माची कहाणी. इतर भटकंतीच्या गोष्टी तुमच्यासमोर वेळोवेळी सादर होत राहतीलच. 

(कालची स्टोरी लवकरच पोस्ट करतोय)

धन्यवाद ….